परभणी, ( आनंद ढोणे पाटील) :- गेल्या तीन दिवसापासून परभणी, हिंगोली,नांदेड जिल्हा परिसरात रात्रंदिवस लहान मोठ्या झड पाऊसाची संततधार चळक वा-यासह चालूच असून ज्या त्या ठिकाणच्या शेत शिवरातून जसे, दुधना, पैनगंगा, गोदावरी, पूर्णा, कयाधू, आसना ह्या मोठ्या नद्यासह सर्वच लहान मोठी नदी नाले दुधडी भरुन वाहत आहेत. पुराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून जावून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार आणि रिमझिम झड पाऊसाची संततधार उघडायचे नाव घेत नाही. सतत पाऊस चालूच असल्यामुळे अनेक ठिकाणी पुराचे पाणी गावात शिरुन हाहाकार उडवत आहे.खरीप पिकातही पुराचे पाणी शिरुन जमीनीतील गाळासह पिके खरडून गेलीत. उभी कोवळी खरीप पिके पाण्याखाली गेली
आहेत.संततधार अतिवृष्टी पाऊसाने यंदाचा खरीप हंगाम जुलै महिन्यातच नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. मोठ्या नद्यांच्या काठावर असलेल्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुराचे पाणी शहरात तथा काही गावात घुसल्यास त्याच्या निवारणासाठी शासनाचे नैसर्गिक आपत्ती जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत कार्य करण्यासाठी प्रत्येक स्थानिक प्रशासनास सुचना देण्यात आल्या असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती आहे.पाऊसाचे सातत्य कायम असल्यामुळे शेत शिवारात चोहीकडे पाणीच पाणी होवून सोयाबीन, तूर,मुग,कापूस, ज्वारी, हळद पिकात पाण्याचा डोह साचून आहे. ही कोवळी खरीप पिके आता ७५ टक्के वाया गेली आहेत.पंधरा दिवसच झाले पेरणी होवून तोच कोवळ्या अंकूरलेल्या पिकाच्या मुळीलाच पाणी लागलेय. त्यामुळे खरीप हंगाम नक्की वाया जाण्याची आपत्ती शेतकरी आनूभवत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अभ्यास अंदाजानुसार १५ जुलै पर्यंत असाच पाऊस राहून त्यानंतर सूर्यदर्शन होईल असे भाकीत वर्तवल्याने नागरिक,शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतात गुरेढोरे पाच दिवसापासून गोठ्यातच बांधून असल्यामुळे त्यांच्या वैरण चा-याची समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. गोठ्यातील मलमूत्र व चिखल गंधंगीने डासांचा प्रार्दूभाव जनावरांना सतावत आहे. गोठ्यात जनावरांना चारा खाता येत नाही. शिवाय बांधावरही चारायला पावसामुळे काढता येत नाही. एकंदरीत, सर्वच बाबतीत पाऊसाची संततधार कायम असल्याने नागरीकांचे कामकाज ठप्प झाले आहे. ब-याच ठिकाणी पुराच्या पाण्याने पूलासह रस्ते तुटून वाहून जात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथे तर तिन दिवसापूर्वी गावाजवळील नदीचे पाणी गावात शिरुन दुकाने, घरात पाणी शिरुन मोठे नुकसान झाले. आखाड्यावरील,गोठ्यात पाणी शिरुन तेथील गुरेढोरे, शेळ्या बक-या, कोंबडे वाहून गेली. काही जनावरे जागीच ठार झाली होती. अजूनही पाऊस चालूच असल्याने तेथील धोका टळला नाही.तसेच आसना नदीच्या पुराचे शुध्दा पाणी जवळील गावात शेतशिवारात शिरुन मोठे नुकसान होत आहे. तेथे जिल्हा प्रशासनासह एनडीआरएफ पथक, पाण बुडी बोट पथक सज्ज असून मदत कार्यासाठी आगेकूच करत आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर, हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडून नदीकाठावरील गावक-यांना सावधतेचा ईशारा देण्यात आला असून काही नैसर्गिक आपत्ती ओढावत असल्यास ज्या त्या भागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाणे यांच्याकडे मदतीसाठी तात्काळ माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे नूतन कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील संपूर्ण राज्यातील पाऊसाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होणा-या ठिकाणच्या भागावर बारकाईने नजर ठेवून तेथील त्वरित अपडेट माहिती घेऊन तात्काळ जिल्हा प्रशासन, स्थानिक आमदार, खासदार यांना सुचना देवून परिस्थितीवर मात करण्यासाठी हिरीरीने मदत देत आहेत.ते स्वतः थेट भ्रमणध्वनीवरुन पुराच्या पाण्यामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या स्थानिक ठिकाणच्या जिल्हा प्रशासन जिल्हाधिका-यास अहोरात्र सतर्क राहण्यासाठी सुचना करत असल्याचे समजते. त्यामुळे राज्यातील जिल्हा खडबडून जागे होवून डोळ्यात तेल घालून नैसर्गिक आपत्तीवर कटाक्षाने लक्ष ठेवीत आहेत.