हेमंत शिंदे नाशिक: हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070
बारावीनंतर आता पदवी चार वर्षांची! पदव्युत्तर पदवी एकाच वर्षात, डीएड- बीएड प्रवेश पूर्वीप्रमाणेच
2024-25 या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठासह संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. आता पदवी तीन वर्षांची नसून चार वर्षांची असणार आहे. तर दोन वर्षानंतर पदवी शिक्षण सोडणाऱ्यांना डिप्लोमाची पदवी दिली जाणार आहे.
बारावीनंतर पदवीला प्रवेश घेतल्यास एखाद्या विद्यार्थ्याला प्रथम वर्ष पूर्ण केल्यानंतर काही अडचणींमुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. त्यावेळी त्या विद्यार्थ्याला एक वर्षाचे स्वतंत्र प्रमाणपत्र मिळेल. तसेच द्वितीय वर्षे पूर्ण केल्यानंतर अर्ध्यातूनच शिक्षण सोडल्यास डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. तिसऱ्या वर्षानंतर शिक्षण सोडल्यास सध्याच्या प्रचलित नियमानुसार प्रमाणपत्र मिळेल, पण चौर्थ्या वर्षाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला संशोधन विषयातून डिग्री मिळणार आहे.
ही पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवीसाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळेल. पण पदवीचे शिक्षण तीन वर्षानंतर सोडलेल्यांना पदव्युत्तर पदवीला प्रवेश घ्यायचा असल्यास त्याला दोन वर्षे शिकावे लागणार आहे. तीन किंवा चार वर्षांची पदवी पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. त्यानुसार पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षातील पहिल्या सत्रात रिसर्च मेथेडॉलॉजी तर दुसऱ्या सत्रात ऑन जॉब ट्रेनिंग असे विषय असतील.
तर पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षातील पहिल्या सत्रात फिल्ड प्रोजेक्ट असणार आहे. पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याला लघु शोधनिंबध बंधनकारक असून एका विषयावरील अहवाल त्याला द्यावाच लागणार आहे. तो अहवाल सादर केल्यावर त्याचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण होणार आहे.
डीटीएड व बीएडची प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम व कालावधी ‘जैसे थे’च असणार आहे. त्यासंबंधीचा बदल व अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. तूर्तास डीटीएड व बीएड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश घेता येईल, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून सांगण्यात आले.