Home Breaking News *सुखी माणुस*

*सुखी माणुस*

✍️ *जिल्हा संपादक नांदेड*✍️

*माणसाला जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते, तो या जगातला सर्वांत सुखी माणूस.*

*ज्या माणसाला झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.*

*असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.*

*असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.*

*भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.*

*त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची अॅडमिशन- परीक्षा- निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.*

*त्याला एक मुलगी असली तरी तो खुष असतो. दोन मुली असल्या तरी खुष असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.*

*त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे- डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो…*

*तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.*

*त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.*

*परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!, पु. ल. देशपांडे.*

*आयुष्य आणि पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे. शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते, आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते.*

*जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक सावली सारखा जरूर कमवा; कारण काच कधी खोटं दाखवत नाही, आणि सावली कधी साथ सोडत नाही*

*गर्वाशिवाय बोलणं, हेतुशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे हे सर्व ख-या नात्याची लक्षणे आहेत.*

Previous articleतहानलेल्या वन्य प्राण्यांची थेट गावाकडे धाव……
Next articleअस असेल जुन 2024 पासुन नवीन शैक्षणिक धोरण