परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्यातील परिसरात गत ४ व ५ जुलै २०२२ पासून रात्रीच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरुपाचा रिमझिम पाऊस होत आहे. अजूनही आकाशात नभ दाटून येत पाऊसाचे वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागाने देखील मराठवाडा विभागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना तूर्तास जिवदान मिळत आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडिद, तीळ, कराळ, ज्वारी ही पिके बहरत आहेत. सध्याच्या रिमझिम पाऊसाने शेतक-यात समाधान दिसून येतेय. या पाऊसाने नदी नात्यांतून काही प्रमाणात पाणी वाहत असून विहीर, बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गत आठवड्यात पाऊसाने उघडीप दिली होती. त्यावेळी शेतक-यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता ४ व ५ जुलै २०२२ रोजी रात्री पडलेल्या रिमझिम पाऊसाने जमीनीत भरपूर ओल तयार झाली. पावसाने खरीप पिकांच्या वाढीस मदत होत असल्यामुळे सारी शेत शिवारं हिरवा कंच नेसल्याचे दिसून येताहेत. हळदीची उगवणशक्ती वाढत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लागवड असलेल्या भाजीपाला, ऊस पिकालाही दिलासा मिळत आहे. परभणी बरोबरच हिंगोली, नांदेड जिल्हा परिसरातही समाधानकारक पाऊस होत असल्याची माहिती येत आहे. सध्याच्या समाधानकारक पाऊसाने भुमिराजा (शेतकरी) वर्ग तूर्तास वरुणराज्याच्या कृपादृष्टीने समाधान व्यक्त करीत आहेत.