Home Breaking News फुकट वाटप योजना आणि त्याचे दुष्परिणाम 

फुकट वाटप योजना आणि त्याचे दुष्परिणाम 

भारताच्या राजकारणात फुकट खाऊ योजनेचा जो उच्छाद सध्या चालू आहे, तो केवळ निवडणुकीचा भाग नाही, ती देश उध्वस्त करण्याची सरकारी ब्लूप्रिंट आहे.

बिहारमध्ये मोफत वीज, मोफत भत्ता, मोफत दान, मोफत सुविधा,—हा जो तमाशा लावला गेला, तो लोककल्याणार्थ नाही.ती मतांची होणारी लिलावबाजी आहे.नोटा बदलल्या, आता नव्या नोटा म्हणजे मोफत योजना आणि ही नवीन चलननीती आहे.

“जोडा मत, मोडून काढा अर्थव्यवस्था.”हा देश स्वतःच्या पायावर उभा राहावा असा संघर्ष करतोय. पण प्रत्येक निवडणूक हीच देशाला मागे ओढणारी नवी साखळी बनतेय.भारताचा आर्थिक भविष्योन्मुख प्रवास जणू एखाद्या ट्रेनला कोणी ब्रेक लावून, नंतर हाताने मागे ढकलत असल्यासारखा झाला आहे.

या मोफत उधळपट्टीमुळे सरकारांनी आपल्या तिजोरीत एकापेक्षा एक मोठे खड्डे करून ठेवले आहेत.हे खड्डे भविष्यात भरून निघणार नाहीत. हे खड्डे म्हणजे आर्थिक कबर आहेत. अजून स्पष्ट सांगायचं तर—हा देश अर्थव्यवस्थेच्या शवपेटीत स्वतःच स्वतःला ठेवतो आहे. तेही निवडणूक जिंकण्यासाठी.

बेरोजगारी एवढी भयानक पातळीवर आहे की युवा वर्गाच्या डोळ्यात आज स्वप्न नाही, केवळ एक फॉर्म आणि त्यावर फुकट काही मिळेल का याची वाट पाहणे.हा युवा भारत आहे की सरकारी अनुदानाचा “ग्राहक”?

आपण स्वावलंबी पिढी घडवतो आहोत की फुकटाकडे बघणारी भिक्षेकरी मानसिकता?

जो देश रोजगार निर्माण करायला हवाय, तो देश अनुदान निर्माण करतो आहे.जो देश उद्योग आणायला हवाय, तो देश फुकट योजना लावत बसलाय.जो देश उत्पादन वाढवायला हवाय, तो देश मतांसाठी खालच्या पातळीवर उतरून “वोट बदल्यात लाभ” देत बसलाय.

_ही अर्थव्यवस्था चालते कशी?_ती रक्तातून चालते, कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, करदात्यांच्या, उद्योगांच्या रक्तातून,..पण भारताला आता हे रक्तकारक ज्ञान विसरायला लावले जात आहे.

त्याऐवजी दिलं जातंय “मोफत” नावाची एक धोकादायक नशा.हो, ही नशा आहे, ही नशा लोकांना काम करण्यापासून दूर नेते आहे.जनता श्रमाचे मुल्य विसरत चालली आहे, श्रमाविणा लोक आळशी, आजारी होत आहेत.तरूणपिढी व्यसनाधीन आणि दिशाहीन होत चालली आहे,ही नशा लोकांच्या पाठीवर कर्जाची पोती बांधून देते.ही नशा उद्योगांना भारताबाहेर पळायला भाग पाडते.ही नशा ग्रामीण भागाला कायमच्या अंधारात ठेवते.आणि,.. ही नशा देशाची अर्थव्यवस्था “लाईफ-सपोर्टवर ठेवलेले रुग्ण” बनवते.*

_ग्रामीण भारत सर्वाधिक जळतो आहे._रस्ता नाही, आरोग्य केंद्र नाही, शाळा नाही.पण निवडणूक आली की अनुदानाचा धबधबा.हा धबधबा विकासाचा नाही— तो फसवणूक करण्याचा सोयीचा पाऊस आहे.पाऊस थांबला की जमीन कोरडी.मोफत योजना थांबली की घरात उपासमार.असा विकास म्हणजे फसवणुकीचा फजितीचा फार्स.

EVM असो, आयोग असो, न्याय संस्था असोत की भ्रष्ट महसूल आणि पोलिस यंत्रणा असोत,—या देशाच्या लोकशाहीचा प्रत्येक आधारस्तंभ संशयाच्या भोवऱ्यात आहे.लोकशाहीचा देवळात ठेवलेल्या विश्वासाला आता तडा जातोय,म्हणूनच फुकटखाऊ राजकारण पुढचे पाऊल उचलू शकते.विश्वास मोडला की जनता विकत घेणे सोपे होते.आणि हे सगळं करताना राजकारणी एवढ्या धिटाईने, बेमुर्वतखोर वागतात जणू विचारतात:

देशाचं काय होतंय? आम्हाला त्याचे काय?”त्यांचा उद्देश स्पष्ट—मत मिळाले की त्यांच्या गाड्या पुढे जातात;देश आर्थिक अंधारात गडप झाला तरी त्यांना फरक पडत नाही.फरक पडायला हवा जनतेला.पण जनता जशी अनुदानाच्या व्यसनात अडकते, तसा प्रश्न विचारण्याचा स्वभाव मरतो.काम नाही, पण मोफत मिळतंयना !!”या एका वाक्यातूनच देशाचा विनाश सुरू होतो.भारत अतिशय मोठ्या आर्थिक भूकंपाच्या उंबरठ्यावर आहे.एक धक्का पुरेल आणि तो धक्का म्हणजे फुकटखाऊ निवडणूक संस्कृती.

विकासापेक्षा मोफत पणाला महत्त्व देणारा देश टिकत नाही, उदाहरण श्रीलंका,—तो हळूहळू आतून कोसळतो. आज बिहारमध्ये दिसतंय ते उद्या भारताच्या हाडांमध्ये मुरेल.आणि त्या दिवशी,..,ना रोजगार उरेल,ना शेती शिल्लक राहील,ना उद्योग उरेल,ना विकास उरेल,ना अर्थव्यवस्था उरेल,उरेल फक्त एक देश— कर्जात बुडालेला, फुकटात जगणारा आणि भविष्याविना.जर हा देश वाचायचा असेल, तर फुकटखाऊ राजकारणाचा अंत झाला पाहिजे.

नाही तर भारताचा अंत फक्त तारीख बाकी आहे.

✍️✍️✍️✍️✍️🙏

कोणी लिहिलंय माहित नाही पण विचार करायला लावणारे आहे.🌹🌹🌹

Previous articleभाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड         
Next articleदेशातील हिंदुत्व हे सरकार हिंदू धर्म रक्षक अहिल्यादेवींच्या विचारांवर घाव का घालतय …?